कळसुत्री भाग ८
प्रत्येक मतदारसंघात मतदारांची समीकरणे वेगळी आहे. गोव्यातील मतदारांना सरसकट एकाच सूत्रात बांधता येत नाही. स्थानिक पातळीवरील राजकारणातील ‘मेख’ ज्याला समजते तोच तिथल्या राजकारणात अग्रेसर राहतो. गोव्यातील चाळीस विधानसभा मतदारसंघात फक्त पेडणे मतदारसंघ सोडला तर बाकी सगळ्या ठिकाणी स्थानिक उमेदवाराला महत्व असते. पेडणे हा सर्वार्थाने वेगळाच मतदारसंघ वाटतो. इथले मतदार देखील ‘अजिबो गरीब’ पद्धतीचे. शेजारचा धारगळ मतदारसंघ २०१२च्या निवडणुकीच्या वेळी पेडणे मतदारसंघात विलीन झाला आणि इथली राजकीय गणितं बदलू लागली पण मतदारांची मानसिकता होती तशीच राहिली. २००७ च्या पूर्वी धारगळ मतदारसंघाचा निवडणूक पूर्व सर्व्हेक्षणात कधी समावेश नसायचा. मनोहर आजगावकर यांचा बालेकिल्ला त्यामुळे याला भाजपने याचा समावेश सर्व्हेक्षणांमध्ये केला नव्हता. पण २०१२च्या निवडणुकीत अनेक गणितं बदलत होती तसे पेडणे आणि धारगळ हे दोन मतदारसंघ एक झाल्यामुळे आता इथली परिस्थिती बदलू शकते का? हे बघण्यासाठी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करून आढावा घेण्याचा प्रयत्न सुरु झाला. हे काम देखील आमच्याकडे आले.
आमच्या संस्थेचे अध्यक्ष यशवंत ठकार आणि मी इथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करायला सुरुवात केली तेव्हा सर्वसामान्य मतदार सुद्धा या नवीन बदलांमुळे उत्सुक होते. पण इथेही सांगे मतदारसंघाप्रमाणे अनुभव येऊ लागला. या भागातली काही ठराविक मंडळी आम्हाला भेटून सतत एका नव्या उमेदवाराचे नाव सांगत होते. हे नाव ऐकून आम्हालाच काय पण खुद्द त्या उमेदवाराला देखील आश्चर्य वाटू लागले आणि हे नवे उमेदवार होते राजेंद्र आर्लेकर.
धरगाळ मतदारसंघाला कायम स्थानिक पेक्षा बाहेरच्या उमेदवाराचे आकर्षण राहिले आहे मग हा मतदारसंघ पेडणे मतदारसंघात विलीन झाला तरी यात बदल झाला नाही. मनोहर आजगावकर हे मडगावचे. पण धारगळ मतदारसंघातून जिंकून येणारे. पेडणे मतदारसंघ अनुसूचित जातींच्या उमेदवारांसाठी राखीव झाला आणि इथल्या स्थानिक उमेदवारांची सद्दी संपली. बाहेरून आलेल्या उमेदवारांना महत्व आले. यात २०१२ ला काहीच संबंध नसताना अचानक राजेंद्र आर्लेकर यांचे नाव येऊ लागल्याने सर्वच स्तरावर आश्चर्य व्यक्त केले गेले. खुद्द राजेंद्र आर्लेकर यांना वास्को मतदारसंघ सोडून पेडणे मतदारसंघात जावे कि नाही याबाबत संभ्रम होता.
संघाचे स्वयंसेवक असणारे आणि जनसंघाच्या काळापासून कार्यरत असणारे राजेंद्र आर्लेकर हे भाजपमधील महत्वाचे नेते. आपला हातचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात काम करणे तसे अवघड. पण २०१२ ला राजेंद्र आर्लेकर यांच्यासमोर पर्याय देखील नव्हता. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी वास्को मधला उमेदवार बदला म्हणून मागणी करायला सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर पेडणे मतदारसंघातील कार्यकर्ते राजेंद्र आर्लेकर यांना पेडणेमधून उमेदवारी द्या असे म्हणत मागे लागले होते. वेगाने घडणाऱ्या घडामोडी बुचकळ्यात टाकणाऱ्या होत्या. उमेदवार आपले नाव सर्वात पुढे राहावे म्हणून ‘लॉबिंग’ करतात हे समजू शकते पण आता ठराविक मतदार ठराविक उमेदवारासाठी ‘लॉबिंग’ करतात तेव्हा मात्र अनेक प्रश्न पडतात. ‘बाहेरचाच उमेदवार का?’ यावर सविस्तर चर्चा करून अहवाल द्यायला सांगण्यात आला.
१. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्यामुळे स्थानिक पातळीवर तसा योग्य उमेदवार नाही.
२. स्थानिक पातळीवरील एकही उमेदवार निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू शकणार नाहीत.
३. स्थानिक उमेदवाराला स्थानिक लोक ‘आतून बाहेरून’ व्यवस्थित ओळखतात त्यामुळे ते त्याला महत्व देत नाहीत.
४. म्हणून आम्हाला आयात केलेलाच उमेदवार हवा.
अशी असंख्य कारणे पुढे आली. बाहेरच्या मतदारसंघातून उमेदवार आयात करायचा आणि त्याचा कंटाळा आला, त्याने यांची वैयक्तिक कामे केली नाहीतर त्याला सोडून परत नव्या ‘आयात’ केलेल्या उमेदवाराला बोहल्यावर चढवायचे प्रयत्न सुरु करायचे. हे या मतदारसंघात सुरूच असते. आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्याच मतदारसंघात निवडणूक लढवणे सोप्पे नाही. पण राजेंद्र आर्लेकरांनी पेडणेकरांची विनंती स्वीकारली आणि २०१२ ला आर्लेकर पेडणे मतदारसंघातून निवडून आले. यात सर्व शक्यता मांडणारा एक युवा कार्यकर्ता होता. आर्लेकरच का? यावर त्याने त्याच्या पद्धतीने मांडणी केली होती. त्याचे म्हणणे होते राजेंद्र आर्लेकर भाजप मधील महत्वाचे आणि ज्येष्ठ नेते आहेत. २०१२ ला भाजपचे सरकार बनणार असे वातावरण होते. यात जर आर्लेकरांनी पेडणे मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकून आले तर त्यांना सरकारमध्ये महत्वाचे मंत्रिपद मिळेल. ज्यामुळे पेडणेवासीयांचे अनेक प्रलंबित प्रश्न सुटू शकतील. विशेषकरून त्याच्यासारख्या युवकांचा नोकरीचा प्रश्न मार्गी लागेल. त्याची ‘थिअरी’ छान होती. निवडणुकीवेळी तो राजेंद्र आर्लेकरांसोबत होता. निवडणूक संपली आमचे काम देखील संपले. आर्लेकर आधी सभापती मग वन- पर्यावरण मंत्री झाले. आता तर ते बिहारसारख्या महत्वाच्या राज्याचे राज्यपाल आहेत. २०२२ च्या निवडणुकीच्या वेळी पेडणे मतदारसंघासाठी उमेदवारांची इतकी वेगवेगळी नवे ऐकायला येत होती आणि यात परत बाहेरच्याच नव्या नावांचा गाजावाजा होता. त्यावेळी तो ‘थिअरी’ मांडणारा युवा कार्यकर्ता आठवला. २०२२ च्या निवडणुकीत तो परत आपली ‘थिअरी’ घेऊन नव्या उमेदवाराच्या मागे गेला नसेल ना?
मनस्विनी प्रभुणे नायक
https://gathanmala.wordpress.com
You must be logged in to post a comment.